पूज्य साने गुरुजी जयंती निमित्त या थोर महात्म्यास विनम्र अभिवादन!!!
मला भावलेले गुरुजी....
"साने गुरुजी" म्हटलं की एक असा चेहरा समोर येतो की ज्याच्याकडे पाहून आपोआप आपण नतमस्तक होतो आणि या व्यक्तीकडे पाहून नकळत मनामध्ये वात्सल्य, प्रेम, जिव्हाळा या भावना दाटून येतात. का बरे असे होत असेल? समजत नाही, परंतु जेव्हा जेव्हा गुरुजींनी लिहिलेले साहित्य मी वाचतो, त्या त्या वेळी प्रयत्न करूनही डोळ्यातून ओघळणारे अश्रू आवरता येत नाहीत. त्यांचे साहित्य मला रडवते असं नाही. त्यातील जी भावना आहे, त्यातील जे प्रेम आहे, जे संस्कार आहेत ते जणू माझ्या मनाला शुद्ध करण्याचे काम करतात.
अशावेळी गुरुजींच्या बद्दल त्यांच्या निकटवर्तीयांनी जे लिहिले आहे, ते वाचण्याचा मोह मला टाळता नाही. ते जिवंत अनुभव किती रोमांचकारी आहेत हे वाचल्याशिवाय कळणार नाहीत. गुरुजींना कधी कुणी प्रेमाने भेट दिलेली कपडे असोत अथवा काही वस्तू असोत वाटेत कोणी गरजवंत भेटला की गुरुजी त्याला ती वस्तू देऊन टाकत. एकदा पायातील चपला सुद्धा त्यांनी रस्त्याने अनवाणी चालणाऱ्या गृहस्थाला देऊन टाकल्या होत्या.
यामागे काय प्रेरणा होती बरे?
प्रेरणा होती. ती म्हणजे त्यांच्या आईची शिकवण! लहानपणी त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर केलेले संस्कार ते कधीही विसरले नाहीत आणि केवळ विसरलेच नाहीत तर त्याप्रमाणेच आयुष्यभर वागले. 'खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे' या गीतांमधून संपूर्ण मानव जातीला एक नवा धर्म त्यांनी सांगितला. कोणतेही प्रश्न कितीही मोठे युद्ध झाले तरी सुटणार नाही. पण ते जटिल प्रश्न प्रेमाच्या वार्तालापाने नक्कीच सुटतील यावर त्यांचा विश्वास होता. आणि आपण पाहतो आजवर अनेक युद्ध झाली पण प्रश्न हे जसेच्या तसेच आहेत.
गुरुजींच्या या कनवाळू स्वभावाला लहानपणी त्यांच्या वाट्याला आलेले अनुभव हे सुद्धा तितकेच कारणीभूत आहेत. आपल्या बालपणी त्यांना भेटलेल्या व्यक्ती आणि अनुभव यांनी त्यांचे भावविश्व समृद्ध केले.
सतत कष्ट करण्याची त्यांची वृत्ती आणि प्रत्येक कामात मागे असलेली प्रामाणिक तळमळ ही सुद्धा अतिशय महत्त्वाची वाटते. गुरुजींनी शिक्षक म्हणून काम करताना त्या सहा वर्षांच्या कालावधीत शिक्षक कसा असावा याचे थोर उदाहरण घालून दिलं. त्याच प्रमाणे स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतल्यानंतर नेतृत्व आणि वक्तृत्व कसं असावं याचंही उदाहरण समोर ठेवलं.
असं म्हणतात की ज्या वेळेस गुरुजी व्यासपीठावरून बोलत असत तेव्हा समोर बसलेला श्रोतृवर्ग आणि तरुण भारावून जात आणि देश कार्यामध्ये सर्वस्व त्याग करून सहभागी होत आणि सभा संपल्यानंतर जेव्हा एखाद्या ठिकाणी गुरुजी बसत असत त्यावेळेस त्यांना पाहून कुणालाही असं वाटत नसे हाच तो माणूस की ज्याने हजारो तरुणांना लढण्याची स्फूर्ती दिली.
असा निरंकारी आणि सर्वकाही अर्पण करूनही मी काहीच केले नाही असा स्वभाव असणारे गुरुजी अतिशय भिडस्त होते इतरांशी बोलताना खूप कमी बोलत असत परंतु काम करण्यासाठी मात्र ते सतत पुढे असत कोणतेही काम असो गुरुजींना ते करण्यामध्ये आनंदच वाटत असेल अगदी काँग्रेसचे पहिलं फैजपूर येथील ग्रामीण अधिवेशन असो त्यामध्ये गुरुजींनी तन मन धन अर्पून काम केले. अधिवेशनाला आलेल्या कार्यकर्त्यांच्या स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्याचे काम त्यांनी स्वतःकडे घेतले होते. खरेतर त्यांना या अधिवेशनात स्टेजवर बसण्याची विनंती केली परंतु त्यांनी नम्रपणे त्यास नकार दिला आणि परिसर साफ ठेवण्यासाठी त्यांनी नेतृत्व केले.
याच प्रमाणे पुण्याचे रामभाऊ वडके एक प्रसंग सांगतात की काही कामानिमित्त ते मुंबईला गेले असताना सर्व कार्यकर्ते भूमिगत होते आणि या भूमीगत कार्यकर्त्यांना निरोप देण्यासाठी रामभाऊ गेले तेव्हा त्यांना जेवण्याचा आग्रह करण्यात आला. तेथे पंचा नेसून स्वयंपाक करणारे गृहस्थ त्यांनी पाहिले पण त्यांनी त्याला ओळखले नाही जेवण झाल्यानंतर वसंत बापट म्हणाले, अरे काही पान बिन आहे की नाही? आणि पुन्हा सगळे गप्पामध्ये रंगून गेले. त्यावेळेस तो पंचाधारी गृहस्थ खाली गेला. रामभाऊ यांनी त्यापूर्वी गुरुजींना फक्त एकदाच पहिले होते तेही धोतर, कुर्ता, टोपी या वेषात. जेव्हा पंचाधारी गृहस्थ खाली जाऊन पान घेऊन आले तेव्हा रामाभाऊंच्या लक्षात आले की ते गुरुजी आहेत. तेंव्हा त्यांना स्वतःचीच लाज वाटू लागली गुरुजींनी आपल्यासाठी तीन जिने उतरून पान आणले ही घटना त्यांना असह्य झाली. त्यांनी क्षमायाचना केली. परंतु गुरुजींनी त्यांची समजूत काढली. अरे जेवणानंतर मी तुझ्यासाठी पान आणले म्हणून काय झालं? या घटनेचे त्यांना काहीच वाटले नाही. परंतु त्यानंतर कित्येक वर्ष रामभाऊंच्या मनावर ही घटना खोलवर रुजली होती. किती मृदू मुलायम मनाचा हा थोर सेनानी होता. हे अशा प्रसंगातून सहज आपणास दिसून येते.
धन्यवाद.